Thursday, April 8, 2010

मूल्य जाणा...किंमत नको!

कलाक्षेत्राशी संबंधित परखड आणि स्पष्ट मत देणारे, तसंच केवळ चित्रकार म्हणून नाही तर पुढच्या पिढीचे चांगले चित्रकार घडवणारे एक 'जबाबदार शिक्षक' म्हणून प्रभाकर कोलते यांचे महत्त्व जास्त आहे. नुकताच त्यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा 'गोदावरी गौरव' सन्मान मिळाला. या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी मारलेल्या गप्पा.
..............

सातवळेकर, सदाशिव साठ्ये, राम सुतार यांसारख्या चित्रशिल्पकारांना गोदावरी पुरस्काराने यापूवीर् गौरवण्यात आलं आहे. तर असा हा पुरस्कार तुम्हाला मिळाला त्याबद्दलची प्रतिक्रिया...

* १९७० मध्ये बेंदे, सोलेगांवकर, पळशीकर असे जजेस असताना सुवर्णपदक मिळालं. त्यावेळी जो फुगा गेला होता डोक्यात तोसुद्धा नंतर पळशीकर सरांनी फोडून टाकला. नंतर ललितकलेची अॅवॉर्ड्स कशी विकली जातात, यात कशी लबाडी चालू आहे हे या क्षेत्रात राहून काम करून कळायला लागलं. १९८६ मध्येच ठरवलं की आता कोणत्याही स्पर्धेसाठी चित्रं पाठवायची नाहीत. बक्षिसासाठी काम नाही करायचं. रेकग्निशनची गरज आहे. ते माझ्या आतूनच येतं. मी स्वत:ला ओळखतो, हेच माझं खूप मोठं बक्षीस आहे.

अगदीच जर कामगिरीबद्दल दखल म्हणून कोणी काही गौरव करायचा म्हटला तर मग घ्यायचा की नाही याचा विचार करीन. पण बक्षिसासाठी रांगेत उभं राहणार नाही. जेव्हा गोदावरी गौरवसाठी मला विचारणा झाली तेव्हा माझ्या 'कलेकडून कलेकडे' या पुस्तकाबद्दल माझा हा गौरव करायचा म्हटला असता तर मग मी तो घेतला नसता, पण हा चित्रकला क्षेत्रातल्या कामगिरीबद्दल गौरव होता आणि तोही कुसुमाग्रजांच्या नावाचा. तसंच, पद्म पुरस्कारांसारखा हा कोणालाही दिला जातो असं नाही, हाच त्याचा मान आहे. म्हणून मी हा स्वीकारायचा विचार केला. कवितेने चित्रांचा केलेला हा सन्मान आहे. मी केवळ याचा प्रतिनीधी आहे.

चित्र-शिल्पांचा संगीत, नाट्य यासारख्या कलांशी काय संबंध असतो, असं वाटतं?

* एकाच शरीराचे हे सर्व भाग आहेत. ते वेगळे कसे करणार? एकत्र काम करणारी ज्ञानेंदिये आहेत ही. नाक, कान, डोळे, तोंड शरीरापासून वेगळं कसं करता येईल? त्यांची सर्व कामे एकमेकांवर खूप विसंबून आहेत. तशीच ती सतत एकमेकांबरोबरच चालतात. सर्व कलांमधून आत्मसात करता करता हळुहळू चित्रांबद्दलच्या जाणिवा वाढतात. प्रत्येक अवयावाला काही संवेदना उपजत आहेत. त्यांची सांगड तंत्राशी घालायची असते. शिक्षणापासूनच हे रुजणं गरजेचं आहे. कलाशिक्षण हे केवळ तंत्र आहे, मुलांमधल्या संवेदना जागवणारं, त्या सजग ठेवणारं आणि त्या वाढवणारं.

पुण्यात येत्या आठवड्यात होत असलेल्या साहित्य संमेलनात अमिताभ, सचिन हे असणार आहेत. केवळ साहित्यिकच नाहीत तर मराठी साहित्यावर प्रेम करणारेसुद्धा या कार्यक्रमात माननीय आमंत्रित म्हणून राहणार आहेत. याबद्दल आपलं काय मत आहे?

* समकालीन म्हटल्यावर आजूबाजूची सजगता असलीच पाहिजे. त्यामुळे इतर क्षेत्रातल्या कोणात्याही समकालीन माननीय व्यक्तींना बोलवण्याबद्दल काही आक्षेप नाहीत, पण जसं जसं कमशिर्अल होतंय तसं तसं ब्रँड स्टार यायला लागलेत. तुम्हाला सेलिब्रेटीच का हवेत? सचिनच का राहुल दविड का नको? केवळ लोकांना खेचण्यासाठी तुम्ही यांना मॅग्नेट म्हणून वापरणार आहात. हा त्यांचा तर अपमान आहेच, पण इतर कलारसिकांचाही अपमान आहे. सचिनला 'भारतरत्न' द्या असं आपण सांगतो तेव्हा तो आणखी ओशाळत असेल. त्याचं तर म्हणणं आहे की जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल मला फक्त क्रिकेटवर लक्ष द्यायचं आहे. अशा या 'रत्ना'ला लोकं खेचण्यासाठी, चार जाहिराती मिळवण्यासाठी वापरतायत. तुम्ही त्याचा आदर करा, त्याला वापरू नका. ती वस्तू नाही. मुळात हा सगळा मूल्य आणि किंमतीचाच प्रश्न झाला आहे. त्यांच्या काँट्रीब्युशनचं मूल्य जाणा आणि त्यांचा योग्य आदर करा. त्यांची किंमत कसली करता? आणि ती किंमत वापरता आहात.. अमिताभकडून मराठी अभिमान गीत म्हणवून घेण्याऐवजी 'मधुशाला' घ्या म्हणून मराठीत. जो सांस्कृतिक रंग आहे, त्यात राजकीयता आणून आहे तो रंग बिघडवू नका. त्यांनाही कळत असतंच की आपण वापरले जातोय. पण त्यांनाही काही इलाज नसतो. नुसता धंदा कसला करताय?

No comments:

Post a Comment