आजूबाजूच्या जगाचा कलाकाराच्या चिंतनावर परिणाम होत असतो. कधी ते संस्कार कलाकाराकडून जपले जातात, तर कधी ते मरतात. एखादी झाडाची बी जमिनीत रुजावी तसे ते रुजतात. पण ते निष्काळजी हाताळल्याने त्यांची पुरती विल्हेवाट लागते.
बरवे इतक्या वर्षाच्या प्रॅक्टीसनंतरसुद्धा म्हणायचे की त्यांचं चित्रं एखाद्या दहिहंडीसारखं वरवर वाढत जातं. पूर्ण होता होता त्याचा बॅलेंस सांभाळणं हे अधिकाधिक कठिण होतं.
असं २० वर्षापेक्षा जास्त कामाचा अनुभव असलेले पांडूरंग ताठे यांचं प्रदर्शन सध्या जहांगीर आर्ट गॅलेरीत चालू झालंय. 'साधारण ८६ साली बेंदेंच्या बरोबर झालेल्या गप्पांतून त्यांचं चित्रं अधिकच फुललं. ते अधिक नेमकं होतं गेलं... दिसतंय तसं करण्यापेक्षा, जसं फिल होतंय तसं चित्रं काढणं चालू झालं.' 'पुढे बरवेंच्या गप्पांतून विचारांना अजून स्पष्टता आली.' असंही ते म्हणतात. 'पांढऱ्या रंगातून शांती, आध्यात्मिकता असं काही प्रतित होतं, असं मला काही वाटत नाही.' अशा भंपक गोष्टींबद्दल परखड भूमिकाही ते मांडतात. 'जे मला वाटतं ते मी करतो...' इति पांडूरंग ताठे....
निसर्ग आजूबाजूचा, आतला, बाहेरचा हाच त्यांच्या चित्रांचा आशय. २० वर्ष पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयात कलाध्यापक म्हणून काम करणारे ताठे सर कामात 'चित्रकार' म्हणून पूर्ण वेगळे दिसतात.
त्यांचं चित्रप्रदर्शन आपल्याला २१ तारखेपर्यंत काळा घोडा येथील जहांगीर आर्ट गॅलेरीतल्या तिसऱ्या एसी गॅलेरीत स. ११ ते सायं. ७ या वेळेत पाहता येईल.
- श्रीनिवास रणसुभे
No comments:
Post a Comment